Monday, January 15, 2007

मानसी

मानसी
"आई, तुला आणि बाबांना लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!" असे म्हणत सलीलने शैलजाला एक मोठ्ठा गुलाबाचा गुच्छ, एक सुंदर भेटकार्ड आणि एक छान पुस्तिका दिली. उत्सुकतेने शैलजा ती उघडून वाचायला लागणार तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. "आई मी बघतो कोण आले आहे ते",असे म्हणत सलील पळत गेला. शैलजाने उत्सुकतेने पहिले पान वाचायला सुरुवात केली. महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आपल्या मुलाने प्रेमावर, फ़ुलांवर, पानांवर , खळखळणाऱ्या झऱ्यावर केलेल्या, बागणाऱ्या हरणावर, वेडावणाऱ्या सुगंधावर , बोचणाऱ्या शल्यावर, काळीज हेलावणाऱ्या दुःखावर अशा विविध विषयांवर केलेल्या कविता वाचताना तिचे डोळे भरून आले, झरझर पाने उलटत ती शेवटच्या पानावर पोहोचली. "माझ्या आईस, जिने मला जीवन जगण्यासाठी आहे ही शिकवण दिली." हे वाक्य वाचनाता डोळे पुसत तिने मान वर केली तर सलील एक मोठा पुष्पगुच्छ हातात धरून उभा होता.
"हा कोणाकडून आहे?" "कोणाकडून अपेक्षित आहे?"
असे विचारताना दोघांनाही हसू आले. आपल्या पतीला,शैलेशला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात राहील याची तिला खात्री होतीच पण कार्यालयीन कामापुढे जेवायला बाहेर नेणे त्याला जमणार नाही याची तिला पुसटशी कल्पना होती."काय म्हणतात तुझे बाबा ?मला कुठे जेवायला नेणे जमणार आहे का त्यांना ?"असे विचारत आलेल्या भेटकार्डावर नजर टाकली.
"नाही. बाबांना एक महत्त्वाची मिटींग आहे , वेळेवर ठरली असे दिसते. "
"मग सलील तुला घरी जेवायचे आहे का आपण जायचे बाहेर?" असे आईने विचारताच सलील ने चटकन आपल्या आवडत्या उपहारगृहाचे नाव सांगून टाकले. "काय रे मी केलेला स्वयंपाक आवडेनासा झालेला दिसतोय?"
" आई, तसे नाही ग .सकाळी तुला आराम, नाहीतरी संध्याकाळी बाबांच्या आवडीचे करण्याचा तुझा बेत आणि तयारी मला दिसतेच आहे. "अस होय, स्वयंपाकघरात सकाळीच तुझी नजर चौफ़ेर फ़िरलेली दिसते. आणि हे कुणाकडून आलय तुझ्यात?"आपल्या बाबांची रात्री अपरात्री डबे हुडकून लाडू वडी खाण्याची सवय आठवून सलीलला गालातल्या गालात हसायला आले.

उंच इमारतीतल्या १२ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या वातानूकुलीत कार्यालयात शैलेश टेबलावर जमलेल्या फ़ायलींच्या ढिगाऱ्यातून एकेक फ़ाईल घेऊन हातावेग़ळी करत होता. स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने आणि कौशल्याने तो आज जैविक तंत्रज्ञान क्षेत्रात एक नावाजलेल्या तंत्रज्ञांची संशोधनशाळा चालवत होता. गेल्या एका तपाची वाटचाल त्याला संशोधक ते व्यवस्थापक ह्या सुवर्णमय आलेखातून नेणारी होती. अविरत कष्ट, जिद्द आणि महत्वाकांक्षा याची जोड त्याच्या उपक्रमांना सतत होती. अमेरिकेत आलेल्या ज्या थोड्या भारतीयांनी त्याच्या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरु केला त्यांत शैलेशचे नाव अग्रभागी होते.
एवढेच नसे थोडके म्हणून नाटक क्षेत्रात नाव कमावण्याची, मराठी भाषेला या परप्रांतात रूजवण्याची, वाढवण्याची त्याची सूप्त इच्छा शैलेश नाट्यदिग्दर्शन व आपल्या नाटकांचे अमेरिकेत प्रयोग करून पूर्ण करत होता. भारतातील नावजलेली नाटके त्याच कलाकारांनी अमेरिकेत किंवा अमेरिकेतील हौशी कलाकारांनी करणे हे जेवढे सहज शक्य होते तेवढेच नव्या नाटकाची निर्मिती व त्याचे प्रयोग इथे का यशस्वी होऊ नयेत हा शैलेशचा प्रश्न असायचा. त्याच्या सारख्याच विचारांच्या तीन मित्रांच्या मदतीने त्याने केलेले प्रयोग यशस्वी झाले आणि मग काही काळानंतर इतर राज्यातील मराठी मंडळींचा हरूप वाढत गेला आणि हौशी कलाकारातूनच हळुहळू अमेरिकेत व्यावसायिक रंगभूमी आकार घेऊ लागली. आपल्या गावात व जवळपास च्या गावात नाटकांचे प्रयोग, नव्या नाटकाच्या तालिमी, नाटकासाठी नवे विषय शोधणे यात शैलेशचा शुक्रवार ते रविवार आणि घरी आल्यानंतरचा वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही. शिवाय मेंदूचा एक कोपरा कायम ह्या विचारांनी व्यापलेला असायचा हे तर सांगायलाच नको. आताही आपली कार्यालयीन कामे पूर्ण करताना पुढच्या नाटकासाठी "मानसी"या लेखिकेने लिहीलेल्या "सखी"कादंबरीचीच निवड करावी हा विचार त्याने मनात पक्का केला होता. तिच्याच कथांवर आधारित दोन नाटकांना प्रचंड यश मिळाले होते. एक नाट्यदिग्दर्शक म्हणून श्रेय शैलेशचे असले तरी मूळ कथाच मनाची पकड घेणारी होती. त्या लेखिकेला शैलेशने जाहीरपणे आपल्या यशात सहाभागी केले होते.
मानसीची ही नवी कादंबरी कौटुंबिक विषयावर होती. तिच्या अनेक कथांना बक्षिसे मिळालेली होती आणि त्यामानाने या कादंबरीला तेवढा प्रतिसाद मिळालेला नव्हता. नाट्यरसिक या विषयाला कितपत उचलुन धरतील याची शंका होती. त्याच्या मित्रांना मोठी जोखीम वाटत होती पण प्रयोग म्हणून त्यांनी त्याला संमती दिली होती. त्या नाटकातील मुख्य भूमिका समर्थपणे निभावू शकेल अशी एकही व्यक्ती डोळयासमोर येत नव्हती हीच शैलेशच्या दृष्टीने मोठी चिंतेची बाब होती. एवढ्यात त्याच्यासमोर त्याच्या सेक्रेटरीने एक भेटकार्ड आणून दिले. मानसीने पाठ्वलेले कार्ड पहाताच त्याला जरा आश्चर्य वाटले आणि ज्या प्रकाशकाने आपल्याला तिचा पत्ता व इतर माहिती देण्यास नकार दिला त्याने आपला पत्ता मात्र मानसीला दिलेला दिसतो. असे मनात येऊन त्याने त्याला चांगले झापायला पाहिजे असे ठरवले. लग्नाच्या वाढदिवसाचे कार्ड पहाताच आपण घरातल्या आपल्या अभ्यासिकेला नक्की कुलूप लावले आहे ना, याची त्याने मनातल्या मनात खात्री केली. नाहीतर सगळ्यावर पाणी फ़िरायचे.! आपल्या पत्नीला आज खास भेट द्यायची त्याने ठरवले होते. तसेच तो तिच्याकडून काही खास भेट मागणार होता. आपल्या कामाच्या व्यापात आपण तिच्याकडे वेळ देणे होत नाही असे निदान आज व यापुढे तरी होता कामा नये अशी त्याने मनाशी खूणगाढ बांधली होती. त्याच्या यशाच्या मागे एक व्यक्ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी होती ती म्हणजे त्याची पत्नी शैलजा. हेच सत्य त्याला मानसीच्या कादंबरीने जाणवून दिले होते आणि म्हणूनच घराघरात घडणाऱ्या या कथेला त्याने रंगमंचावर नेण्याचा निर्णय घेतला होता. तेवढ्यात आलेल्या दूरध्वनीच्या आवाजाने त्याच्या विचारांची श्रृंखला तुटली. "सखी" च्या प्रकाशकाने आज दुपारी त्याच्या कार्यालयात नाटकाच्या हक्काची चर्चा व वितरणाचे मुद्दे पक्के करण्याकरता बोलावले होते.

मानसी आज अमेरिकेतील नावाजलेली लेखिका झाली होती. गेल्या आठ वर्षात तिचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले होते. तंत्रज्ञानावर आधारित रहस्यमय कथा, विनोदी कथा, बालकथा आणि स्त्रियांच्या समस्यांना वाचकांपुढे आणणाऱ्या कथा अशा विविध प्रकारच्या विषयांवर तिचे लेखन अल्पावधित लोकप्रिय झाले होते. आपल्या असंख्य चाहत्याशी ती पत्राद्वारे व ईपत्रांद्वारे संपर्क ठेऊन असली तरी तिची व्ययक्तिक माहिती तिने कोठेही प्रकाशित केली नव्हती.

गाडीतून उपहारगृहाकडे जाताना शैलजा कोणाचे शुभेच्छांचे फ़ोन आले, भेटकार्डे आली त्याचा विचार करत होती. सगळ्याना आभाराची कार्डे पाठवायला हवीत.येत्या रविवारी गावातल्या मित्रमंडळीना पार्टी देणार आहोत, त्याची सगळी व्यवस्था नीट झाली ना ते सुध्दा पहायला हवे. शैलशने पार्टी मध्ये त्याला काय काय हवे आहे कोणाला बोलवायचे आहे या साऱ्याची यादी तिला दिली होती व तो आपल्या पुढच्या नाटकाची जाहीर घोषणा सुध्दा तेव्हाच करणार होता. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसात आणि ह्यात किती फ़रक झालाय.. शैलजाचे मत भूतकाळात शिरले होते. एकमेकांनी एकमेकांसाठी दयायचा वेळ कुठे गेला तो तिला शोधून सापडेना.
सलीलच्या जन्मानंतर उच्चशिक्षित शैलजाने आपली संगणकक्षेत्रातली नोकरी सोडून घराकडे पूर्ण वेळ दयावा अशी सगळयांची इच्छा त्यामुळे शैलजा घरी होती. आपल्या मुलाच्या संगोपनात कोणतीही कसर राहू नये असेच तिलाही वाटायचे. शैलेशचा कामाचा व्याप वाढत होता. त्यामुळे लहानग्या सलीलला सांभाळणे,तो शाळेत जायला लागल्यावर त्याचा अभ्यास, घरकाम, पाहुणे, मराठी मंडळाचे कार्यक्रम हे करुन मग शैलेशला व्यवस्थापनात सुरुवातीला जमेल तशी मदत करणे हाच तिचा विरंगुळा. तंत्रज्ञानात ज्या गतीने बदल होत जातात त्या गतीने नव्या गोष्टी शिकल्या नाहीत तर लवकरच आपण मागे राहू याची जाणीव असल्याने शैलजा जमेल तसे व्यवस्थापनशास्त्रात नवनविन शिकण्याचा प्रयत्न करत होती. तरीदेखील सारे व्याप सांभाळून आपण पुन्हा संगणकशास्त्रात नोकरी मिळवणे अवघड आहे ह्याची तिला जाणीव होती. सलील मोठा होत गेला आणि दुसरीकडे शैलेशचा व्यवसायात अधिकाधिक जम बसत गेला साहजिकच आता शैलजाच्या मदतीची गरज नव्हती. आपल्या कार्यालयात येऊन तिने काम करण्यापेक्षा तिने दुसरीकडे मन गुंतवावे असे शैलेशचे म्हणणे होते.

आयुष्यात एकाएकी आलेल्या पोकळीची जाणीव तिला गुदमरवून टाकणारी होती. संसारासाठी आपल्या नोकरीचा हट्ट तिला सोडून द्यावा लागला होता, ती जे काही मदतीचे कार्य करत होती ते सर्व करताना तिची ओळख शैलशची पत्नी अशीच होती. आता नोकरी करावी तरी कोणती मिळेल? शैलेशला पटेल? आणि आपल्यात तरी तो आत्मविश्वास उरला आहे का?या प्रश्नांचे काहूर मनात माजले होते. आपल्या एका मैत्रिणीला, तिच्या मुलाने काय करावे व त्याचे परिणाम काय होतील हे सांगत असताना, अचानक शैलजाला आपण खूप काही करू शकतो याची जाणीव झाली. खरच असे मार्गदर्शन हवे असणारे कितीतरी पालक व लहान मुले असतात त्यांच्यासाठी आपण काही केले तर?मग मराठी मंडळात लहान मुलांसाठी संस्कारवर्ग चालवण्यास तिने सुरुवात केली. हळूहळू इतर भाषिक कुटंबातील मुलांनी सहभाग घेतल्याने तिच्या कामाची व्याप्ती वाढली झाले आणि तसाच तिचा आत्मविश्वासही. "स्वतःचे काही सुरु कर" असे शैलेश तिला नेहमीच सांगायचा. "अग काहीच करता आले नाही तर पूर्वी लिहायचीस ना कविता, तश्या कविता लिही." असे शैलेश तिला चिडवायचा आणि खरच शैलजा आता मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी लिहू लागली होती व दिवसेन दिवस तिची प्रतिभा फ़ुलत गेली.त्याचा परिणाम मात्र असा झाला की एरवी घरी राहून कंटाळणारऱ्या शैलजाचा आता वेळ कसा घालवावा याचा प्रश्न न राहिल्याने शैलशने आता आपण अधिक वेळ स्वतःच्या कार्यक्रमांना देऊ शकतो असा समज करून घेतला आणि तो आपल्या ध्येयाकडे कसे जाता येईल यात मग्न राहू लागला. सकाळी चहा पिताना, संध्याकाळी जेवताना असे जे काही थोडेसे संभाषण व्हायचे ते वगळता दोघे कुठे फ़िरायला गेली, एखाद्या गोष्टीवर चर्चा, त्याने शैलजाला चिडवणे, विनोदाने तिला हसवणे या साऱ्याकरता आता वेळच उरला नव्हता. दोघे कुठे गेली तरी त्याचे कारण शैलशचा व्यवसाय व नाटकाशी निकडीत असायचे त्यामुळे तो वेळ आपला नाही असे वाटून शैलजाचे मन आपल्या नात्यात एक औपचारिकता उरली आहे या विचाराने विषण्ण होई.
"आई, अग तू विचारत डावीकडे वळायचे विसरलीस! जेवायला जायचे आहे !तरी मी सांगतो मला चालवू दे गाडी!"आई गाडीत असली की आपल्याला ती गाडी चालवू देत नाही हे आईला सांगण्याची एकही संधी सलीलने आजवर सोडली नव्हती.
जेवता जेवता शैलजाचे मन भूतकाळाचा आढावा घेत होते. ती विचार करत होती. "खर काय कमी आहे आपल्या आयुष्यात? काहीच नाही. सगळी सुखे हात जोडून उभी आहेत. आपण मदतीसाठी वापरेल्या पैशाचा एवढासाही उल्लेख शैलेश कधी करत नाही का हिशोब विचारत नाही. त्याच्या इतर मित्रांसारख्या आपल्याला त्रासदायक ठराव्या अशाही शैलेशला सवयी नाहीत . आहे फ़क्त पुढे जाण्याची आणि करत असलेल्या कामाला वाहून घेण्याची नशा. याच तर गुणांवर आपण किती खूश होतो. आता त्याच्याचमुळे आपल्याला तो अधिक वेळ देऊ शकत नाही. "तिने भांडून रागाऊन, रुसून बघितले होते. पण या कशालाही दाद देणाऱ्यातला आपला नवरा नाही याची तिला खात्री होती. शेवटी तिने परिस्थिती स्विकारली होती. व्यवस्थापन विषयक पुस्तकांमध्ये" तुमचे ध्येय आणि कुटुंब" असे लेख वाचूनही शैलेशवर त्याचा काही परिणाम झाला नव्हता. नवऱ्याकडून आपल्याला जास्त वेळ मिळावा असे तिला वाटायचे तरी "हनी कशी आहेस तू" असे नाटकी आणि दिखावू प्रेमही तिला नकोच होते. आपल्या अहंकारासाठी मुलाचा बळी तर तिला द्यायचाच नव्हता त्यामुळे खंबीरपणे व प्रेमाने आपलयाला पतीचे लक्ष कसे वेधून घेता येईल हेच तिने करायचे ठरवले होते. आपले वडील इतर मुलांच्या वडिलांसारखे माझ्या शाळेत, महाविद्यालयात का येत नाहीत हे सलीलला समजवून सांगताना मात्र तिच्या नाकी नऊ येत असत. त्यावर तिने शैलेशच्या नावाने मुलाला भेटी पाठ्वणे हा मार्ग काढला होता व "एक वडील म्हणून कमीत कमी महिन्यातून दोन वेळा आपल्या मुलगा काय करतो? त्याचे पुढील बेत काय आहेत? यासाठी सलीलला वेळ द्या" असे ठणकाऊन शैलेशला सांगितले होते. त्यामुळेच ईमेल द्वारे इतर वेळी संपर्कात असणाऱ्या पितापुत्रांमध्ये मैत्रीचे नाते राहिले होते.

कामांच्या यादीतून एक एक आटोपून प्रकाशकाच्या कार्यालयात जायला मानसीला थोडा उशीर झाला होता, शैलेश येणार आहे ,त्यांना भेटूनच जा असे प्रकाशकाने म्हणताच मानसीने गडबडीने बोलणे आवरते घेऊन निघण्याचा निर्णय घेतला. पण उशीर झाला होता हे खरे! बाहेर येत असताना दारात उभ्या शैलेशकडे पाहून प्रकाशकाने दोघांची ओळख करून दिली"ह्या पहा मानसी आपल्या नाटकाच्या लेखिका, यांनाच भेटायचे होते ना आपल्याला?, आणि हे शैलेश आजचे प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक! त्याचे वाक्य संपताना मानसी या नावाने उभ्या असलेल्या शैलजाला पाहून शैलेशला आश्चर्याचा धक्का बसला होता आणि शैलजा.. तिला तर काय बोलावे हेच कळेना.."आता जरा घाईत आहे रात्री बोलू "असे म्हणून शैलेश प्रकाशकाशी बोलणे आटोपून निघून गेला तेव्हा शैलजाला आपल्या हातून घडलेल्या चुकीची प्रकर्शाने जाणीव झाली.. अनेक वेळा शैलेशला आपण सांगायचा प्रयत्न केला पण स्पष्ट सांगायचा धीर झाला नाही हे तिचे मन मान्य करत होते.
या घटनेने शैलजाच्या उत्साहावर पाणी पडले होते. यंत्रासारखी इतर कामे आटपून घरी आल्यावर आज सात वाजताच घरी आलेल्या शैलेशला पाहून शैलजा एकीकडे मनात सुखावली होती पण धास्तावली होती यात शंका नव्हती. "मला येऊन बराच वेळ झाला आणि शैली कॉफ़ी तुझ्याकरता केली आहे. गरम आहे. चटकन घे" या उद्गारांनी तर तिला काय बोलावे हेच कळत नव्हते. बहुधा आज "वाढदिवस स्पेशल" वागण दिसतय असे म्हणून ती झटपट स्वयपाकाला लागली. नाहीतर संध्याकाळी आठच्या आत कधी शैलेज घरी आल्याचे तिला स्मरत नव्हते. जेवताना "आई, बाबा आज तू काय करत असतेस घरात हे पहायला आले होते "असे बाबा म्हणतात. "हो ना बाबांचा वेळ जात नाही की काय असे दिसते. मग काय हो काय सापडले तुम्हाला ?"
"खूप काही "चिंतामग्न चेह्ऱ्याने शैलेशने उत्तर दिले. ते पाहून शैलजाने रात्री काही न बोलता आधी स्वतःच माफ़ी मागायचा निर्णय घेतला होता.
रात्री आता अभ्यासिकेतून शैलशला बोलवावे? की त्याने खोलीत यायची वाट पहावी ?या विचारात येरझाऱ्या घालत रात्रीचे बारा वाजायची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे तिने अभ्यासिकेच्या दारावर हलकेच टकटक केले. दार उघताच पहाते तर काय? तिने पाठ्वलेली सगळी भेटकार्डे, पत्रे, छोट्या नोंदी, अगदी लग्नाआधिपासून ते या वर्षीच्या भेटीपर्यंत शैलेशने सजवून खोलीभर लावले होते. आणि हातात त्याने एक तिने मराठीत लिहीलेले पत्र घेतले होते. डोळे मिचकाऊन त्याने "नवीन कथा कोणती आहे? मी त्यावर नाटक बसवणार आहे बर का!आता यानंतरच्या कथेचा विषय मी सांगणार! त्याला मध्येच थांबत शैलजा "खर म्हणजे मी तुला आधी सांगायला हवे होते सगळ, तुझ्यापेक्षा माझेच चुकले आहे. असे म्हणत स्फ़ुंदायला लागली होती. त्यावर शैलशने तिने दिलेल्या भेटीकडे बोट दाखवत म्हटले "तू दिलेली भेट मला तितकी आवडली नाही. " "आणखी काय हवे आहे? सार काही तुझच तर आहे.""आता आजवर जे दिले नाहीस ते मागणार आहे! रडतेस काय, चुकले काय म्हणतेस, अग चूक तर माझीही आहे. पण ते जाउ दे.आज तो विषयच नको. " माझ्या नाटकात मुख्य भुमिका करशील का?"शैलजाचा आपल्याच कानावर विश्वास बसेना, "चालेल तुला माझे नाटकात काम करणे?""आता तुझे लेखन सांभाळून कसे करायचे ते पहा म्हणजे झाले. मला तरी तुझ्या कथा पूर्ण करता येणार तू जशी माझी ऑफ़िसातली कामे सांभाळते तसे!"शैलेशच्या खांद्यावर विसावताना शैलजाला सारी वर्षे मोरपिसारखी अलगद उडून आपण भूतकाळात तर नाही ना असा भास होत होता. सकाळी दार वाजल्यावर अभ्यासिकेतून बाहेर येत शैलेशने सलीलला विचारले "काय रे काय झाले? कोणाला शोधतोस?" "बाबा गाडी घरात आहे,मग कुठे गेली आई?"
अभ्यासिकेकडे निर्देश करत शैलेशने उत्तर दिले " आई ? माझी मानसी आहे आत , तिला शोधतोस का तू?"ते ऐकून बाहेर येणाऱ्या आईला व हसणाऱ्या बाबांना पाहून सलील मात्र चांगलाच गोंधळला होता.
-सोनाली जोशी

No comments: