Wednesday, January 17, 2007

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर

कै.शिवाजी सावंत यांची "युगंधर"ही कलाकृती माझ्या वाचण्यात आली. त्यांचे छावा आणि मृत्युंजय मला आवडले होते. त्यामुळे या पुस्तकाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. पुस्तकाने त्या पुर्ण केल्या यात शंका नाही. तेव्हापासून त्याविषयी काही लिहावे असे मनात होते. माझ्या मनाला भावलेले व मनोगतींना दाखवावेसे वाटलेले मी येथे लिहीणार आहे. या महान ग्रंथावर भाष्य करण्याची वा त्याची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.
युंगधरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे जीवन सामान्यापुढे उलगडून त्याला साहित्य, विज्ञान आणि इतिहासाच्या पाटीवर तावून सलाखून घेण्याच काम शिवाजी सावंतांनी केले आहे. त्याकरता त्यांनी भारतभर केलीली भ्रमंती आणि उपयुक्त दाखले आणि छायाचित्रे दिली आहेत. हे सर्व शिवाजी सावंताच्या शोधक वृत्तीचे प्रतीक आहे .आजच्या विज्ञानयुगात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा वेध घेताना त्यात कुठेही भावूकपणाची छ्टा आढळत नाही. १००० पानी ग्रंथातील प्रत्येक ओळ सावंतांच्या मराठी भाषाप्रभुत्वाची बोलके उदाहरण आहे. युगंधर वर चार भागात लिहायचा विचार आहे. त्यावेळी मी जमेल तेवढा साहित्यिक दृष्टीने आढावा घेणार आहे त्याकरता मला आवडलेली वाक्ये पुस्तकातून जशीच्या तशी लिहीणार आहे. अर्थात मला आवडलेले सगळे आपल्याला भावेल असे मुळीच नाही. आता थोडेसे पुस्तकाच्या मांडणी विषयी. मनोगतावर रसिक आणि साहित्याची आवड असणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता सांगायचे तर मृत्यंजयाच्या साच्यात युगंधराची आखणी केली आहे. ग्रंथाची सुरुवात प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या तळी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेने होते. त्यानंतर रुक्मिणी, दारुक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी व उद्धव अशाक्रमाने व्यक्तीरेखा त्यांचे व श्रीकृष्णाचे नाते उलगडून दाखवतात. हे वाचल्यानंतर राधेचे नाव स्वतंत्र कसे नाही हा प्रश्न मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. साहित्यात वेगवेगळ्या भाषेत शृगाररसप्रधान खंडकाव्यातून राधा जनमानसात आली. परंतु शिवाजी सावंतानी राधेला प्रातिनिधिक गोपस्री म्हणून घेतली आहे. आपल्या गोकुळाच्या आठवणी सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडी राधेचा-प्रिय गोप सखीचा उल्लेख आहे. राधा या जोडशब्दाचा अर्थ मोक्षासाठी तळमळणारा जीव असा आहे.राधेबरोबर रास खेळणारा श्रीकृष्ण म्हणतो" मी आणि राधा राधा आणि मी गोप आणि गोपी पूर्ण उन्मनी झालो होतो.राधाकृष्ण ही दोन शरीरे उरली नव्हती." पुढे श्रीच म्हणतात"स्री ही विधात्याची निकोप प्रेमाची कसली वासनारहीत संस्कारशील कलाकृती आहे याची गुरुदक्षिणा राधेने मला दिली, बारीक सारीक सर्व मात्रांसह.खरच राधा माझी पहिली स्त्री गुरु होती."
आता भगवान श्रीकृष्णाचे सावंतांनी वर्णन केले आहे ते असे"माझ्या कंठात पांढर्‍याशुभ्र फ़ुलांची, मध्येच हिरव्याकंच पानांचे कलाश्रीमंत गुच्छ गुंफ़लेली टवटवीत "वैजयंतीमाला" विसावलेली आहे.तिला घेरून कौस्तुभमणीधारी कंठेच कंठे आणि कितीतरी सुवर्णी अलंकार छातीवर रुळताहेत....माझ्या झळझळीत पीतांबरावर अश्वत्थाची पान चुकवून उतरलेले सूर्यकिरणांचे काही चुकार कवडसे ऐस पैस पसरलेत.त्यामुळे हे पीतांबर कस अंगभर झळझळून उठल आहे....माझ्या अथक आणि उदंड भतकंती केलेल्या या चक्रवर्ती तळव्यातच "जरा"नावाच्या व्याधान नुकताच सोडलेला, खोलवर रुतलेला एक सुची बाणही मला स्पष्ट दिसतो आहे!......उजव्या पायाच्या टाचेशी दाटलेलं माझ्याच दुर्लभ, उष्ण रक्ताच थारोळहि पसरलेल मला दिसत आहे. रक्त ! खरच रक्त म्हणजे असत तरी काय?तो असतो चैतन्याने अखंड काळाला साक्षी ठेवून दिलेला संस्कारशील हुंकार! पिढ्यानपिढ्याच्या दिर्ध साधनेच्या संस्कारशील वाटचालीन लाभलेला.
युगंधर मध्ये मथुरेचे सुंदर वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे द्वारकेची निर्मिती, हस्तिनापूर तसेच मयासुराने बांधलेली पांडवांची राजनगरी यांचे वर्णन करतांना आपल्याला सावंतांचे शब्दसामर्थ्य कळते. ही नगरे वाचकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहतात असे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीकृष्णाला मिळालेले प्रत्येक रत्न आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, युध्दे याची वर्णनेही वाचनीय आहेत. आचार्य सांदिपनींच्या आश्रमातील विद्याथीदशेतल्या श्रीकृष्णाचे १४ विद्या आणि ६४ कलांचे अध्ययन व त्याअनुशंगाने येणारे प्रश्न आणि उत्तरे म्हणजे वाचकांना पर्वणीच यात काही शंका नाही. गोमंत पर्वतावरील वास्तव्य,भगवान परशुरामांची व श्रीकृष्णाची भेट, सुदर्शनचक्राची प्राप्ती, जरासंधाबरोबर केलेले युद्ध ही सर्व वर्णने पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.
आपल्या पत्नीचे रुख्मिणीचे वर्णन करतांना श्रीकृष्णाच्या मुखी सावंतांनी पुढील वाक्ये आपल्या शैलीत लिहीली आहेत."पूर्ण उमललेया चंद्रविकसी कुमुदकमळासारखी दिसत होती तिची चर्या! उत्सफ़ुल्ल, यौवनरसरशीत. माझ्या रथाच्या दंडावरचा सुवर्णी गरुडध्वज बघताच तिची चर्या कशी आनंदोर्मीन फ़ुलून आली. लाख लाख सुवर्णी गरुडपक्षीच जसे काही मैनाकपर्वत शिखरासारख्या उन्नत दिसणार्‍या तिच्या प्रसन्न चर्येवर उतरले. ......ती आली !उन्हात उजळलेली अंबिका मंदिराची एक एक श्वेत पायदंडी धिमेपणाने उतरत, चालत संगमरवरी शिल्पासारखी! शरदातल्या प्राजक्तगंधित टवटवीत पहाटेसारखी! आषाढाच्या प्रारंभी सावळ्या मेघमालेत तळपून उमटणार्‍या वीजरेघेसारखी. ......दुसर्‍याच क्षणी तिचे काळेभोर, टपोरे तरीही अरागस डोळे माझ्या मस्तकीच्या मोरपंखाला भिडले!त्याच्या हव्या हव्याशा नितळ आवाहक रंगच्छटात जसे खिळूनच पडले!...
रुख्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन जसे सावंतांनी केले आहे तसेच श्रीकृष्णाच्या तोंडी वारंवार तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यानी वर्णन केले आहे. रुख्मिणीच्या बुद्धिमत्तेचा पहिला दाखला म्हणजे तिने श्रीकृष्णास लिहीलेल्या पत्र होय. आपल्या जीवनसखीचे केवळ सौंदय न पहात तिच्या बुद्धिमत्तेकडे आदराने पहाण्याची श्रीकृष्णाची दृष्टी आजही समाजाला मोठी शिकवण देते आहे. श्रीकृष्णाच्या शब्दात सांगायचे तर"ती जशी अनुपम सौंदयवती होती तशीच अजोड बुद्धिमानही होती. ...रुख्मिणीच्या आगमनाने माझ्या जीवनातील रंगीविरंगी 'संसारपर्व'सुरु झाल होत....रुख्मिणीच्या आगमनानं माझी भावद्वारका नाना भावगंधांनी रंगछटांनी कशी अंगभर खुलून गेली- 'ऋतुस्नात' झाल्याप्रमानं!तिच्यावर एक आगळीच 'नव्हाळी' चढली!! येथे सावंतांनी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा रुक्मिणीच्या व्यक्तिरेखेशी जोडून पुढचे पर्व सुरु केले आहे.

रुख्मिणी आपले अन श्रीकृष्णाचे जीवन उलगडून दाखवताना रुख्मिणी म्हणते की श्रीकृष्णाचे जीवन द्वारकेला घेर करुन असलेल्या सागरासारखे आहे आणि त्याच्या अविरत लाटांसारख्या आहेत माझ्या मनात अनंत स्मृती. स्मृतींच्याही आहेत अगणित लाटा...या लाटा सांगतांना माझी तारांबळ उडते आहे. जस जमेल तस आठवेल असे मी हे क्रमाने मन:पूर्वक सांगणार आहे. शिवाजी सावंतांनी रुख्मिणी या व्यक्तीरेखेद्वारे स्त्रीच्या मनातील विविध भावनांना योग्य शब्दात वाट करुन दिली आहे. त्याकाळात रूढ असणारी बहुपत्नीत्वाची पद्धत आणि त्यामुळे थोरली महाराणी या नात्याने करावि लागणारी तडजोड, धाकट्या राण्यांना मार्गदर्शन, पतीची विभागणी हे सारे करतांना सात्विक स्वभावाच्या रुख्मिणीची होणारी घालमेल त्यांनी विविध प्रकारे उत्तमोत्तम दाखले देवून आणि रुक्मिणीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून टिपली आहे. तेवढ्याच ताकतीने त्यांनी आपल्या शक्तीची जाणीव झालेल्या रुख्मिणीने ज्या खंबीरपणे श्रीकृष्णाला साथ दिली, त्याच्या अनुपस्थितीत सून म्हणून व थोरली महाराणी आणि माता म्हणून आपल्या कर्तव्यात कुठेही कसर ठेवली नाही हे ही दाखवले आहे. आपल्या पतीची दिनचर्या रुख्मिणीने नेमक्या शब्दात सांगितली आहे.रुख्मिणीची व्यक्तीरेखा वाचकांसमोर स्मयंतकमण्याचे नाट्य,नरकासुराचा वध, कामरुप देशातील सहस्र स्रीयांची मुक्त्तता आणि द्रौपदी स्वयंवर यांचा विस्तृत वेध घेते. रुख्मिणीच्या व्यक्तिरेखेत पांडवांचा आणि त्या ओघाने आलेल्या घटनांचा उल्लेख आहे. द्रौपदीस्वयंवरचे आमंत्रण बघून रुख्मिणीने पाचवी सवत म्हणून तिला स्विकारण्याची तयारी ही गोष्ट जरा वेगळी वाटते परंतु आपण तेथे का जातो आहोत हे त्यांना श्रीकृष्णाने न सांगितल्याने त्यांनी केलेल्या विचारात काही काही गैर वाटत नाही. अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकल्यावर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात "ही माझी तिसरी भगिनी!" आणि ते "प्रातिवत्याच्या शिखराला जाशील असा आशीर्वादही द्रौपदीला देतात". रुख्मिणीशी निगडीत घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या तिच्याशिवाय सात पत्नी आणि त्या सर्वांना झालेली अपत्यप्राप्ती, त्यांची नावे , स्वभाववैशिष्टे यांचे वर्णन याच पर्वात सावंतांनी केले आहे. त्याचबरोबर सुदामाभेट,सुभद्राहरण यांचेही या पर्वात वर्णन सावंतांनी आपल्या ओघवत्या, रसाळ शैलीत केले आहे. दारुक युगंधरातील तिसरी व्यक्तिरेखा आहे दारुकाची,भगवान श्रीकृष्णांच्या सारथ्याची. दारुक म्हणतो"एखादया कसदार चित्रकारानं सुरेख रंगसंगतीच आकर्षक चित्र रेखाटाव. भवतीच्या अवघ्या विश्वानं ते डोळे विस्फ़ारत थक्क होऊन बघाव तसच माझ्या स्वामींच जीवनकार्य ठरलं. अस चित्र रेखाटतांना चित्रकाराच्या कुंचल्यातून त्याला नकळतच चारदोन रंगतुषार बाजूला इकडतिकड उडावेत तेच ओंजळीत झेलून घेऊन मी हे सांगतो आहे.""कुंभातून ओतल्यासारखा धो धो, सरळ कोसळणारा मुसळधार,वायुलहरींवर हिंदकळत उतरता रिमझिमता, मध्येच थांबणारा, पुन्हा कोसळणारा, उन्ह पावसाचा खेळ खेळणारा श्रावणी, अशा पर्जन्याच्या अ‌संख्य लयी असतात. एकीसारखी मात्र दुसरी कधी असते का?नाही. तसचं आमच्या द्वारकाधीश महाराजांचं जीवन होत. त्यानंतर दारुकाने जरासंधाबरोबर झालेले भीमाचे द्वंद्व युध्दाचे वर्णन केले आहे. इंद्रप्रस्थातील राजसूय यज्ञ, शिशुपाल वध,द्रौपदीवस्रहरण याचा वेध घेतला आहे. घोर अंगिरस गुरुंच्या आश्रमातील दिवस याचे वर्णनही दारुकाने केले आहे. द्वारकाधीश अंगिरसांच्या आश्रमात का आले हयाचे कारण सांगतांनाआचार्य म्हणतात,"तू इथे आला आहेस ते भवतीच्या सर्वांना आणि युगायुगाच्या पिढ्यांआ मनाचा विषाद काय असतो ते पटवून देण्यासाठी. रात्रीचा अनुभव घेतला तरच दिवसाचं मोल लक्षात येतं. अंधाराचा अनुभव घेतला तरचं प्रकाशाचं मूल्य कळतं."या पर्वाच्या शेवटी दारुक म्हणतो"छे !स्वामी म्हणजे नेमके कोण आहेत? काही काही केल्या कळतच नाही."!आता पुढील भागात द्रौपदी आणि अर्जून ह्या व्यक्तिरेखा आणि त्याच्या मनातील भगवान श्रीकृष्ण याचा आढावा घेऊ या.

द्रौपदीआपल्या जन्माशी निगडीत असलेल्या घटनांचे वर्णन करुन द्रौपदी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात करते. त्या निमित्त्याने तिची आणि कृष्णाची पहिली भेट झालेली आहे. स्वयंवराचा अवघड पण जर पूर्ण करता आला नाही तर काय होणार असा विचार तिच्या मनात येत असतांना आसानावरुन उठलेलेल्या द्वारकाधिषांना उद्देशुन सभेने काढलेले उद्गार ऐकताच, द्रौपदी मान वर करुन पहाते. तिच्या मनात विचार विचार चमकतो की यांनी जर पण पूर्ण केला तर यांची पत्नी म्हणून आपले जीवन कसे असेल? रुक्ख्मिणीदेवी आपला स्वीकार करतील ना? पण तेवढ्यात अर्जुनाने पण जिंकल्यावर त्याच्या गळ्यात वरमाला चढवल्यावर द्रौपदी कृष्णाकडे बघून म्हणते की द्वारकाधीषांच्या डोळ्यात क्षणापूर्वी पाहिलेल्या अभिलाषेचा लवलेशही नव्हता, होती ती स्फ़टीकासारख्या बंधुभावापेक्षाही पारखायला कठीण अशी छटा! कुंतीने 'भिक्षा वाटून घ्या' असे सांगितल्यावर सखा श्रीकृष्णाने तिची घातलेली समजुत द्रौपदीने वर्णन केली आहे.
आपले पाच पती एका पत्नीच्या आणि इंद्रप्रस्थाच्या महाराणीच्या दृष्टीकोनांतून कसे भासले, याचे विवेचन विविध घटना, उदाहरणे देऊन द्रौपदीने केले आहे. इंद्रप्रस्थाची महाराणी या नात्याने अर्थात ती महाराज युधिष्ठीरांची श्रेष्ठ पती म्हणून निवड करते तर एक स्री म्हणून भीमसेनाची! 'माते कोणतीही कुलस्त्री कधी भिक्षा होऊ शकत नाही' असे युधिष्ठीर केवळ आपल्या अभिलाषेने म्हणाला नाही आणि त्याने स्वत: द्यूत हरलयावर, आपल्या पत्नीला पणाला लावले. यामुळे दुखावलेली द्रौपदी म्हणते की" तो केवळ माझे विच्छेदनच करुन थांबला नाही तर त्याने कुठल्याही क्षत्रीयाने प्राणपणाने जपावे अशा स्वस्रीच्या लाखमोलाच्या लज्जेचे धिंडवडे काढले. दोन्ही वेळी सख्या श्रीकृष्णाने माझे रक्षण केले." आपल्या पाचही पतींचा सगळ्यात आवडलेला गुणविशेष म्हणजे त्यांची पारदर्शक मातृभक्ती असे द्रौपदी सांगते. ती म्हणते की हे पाचही बंधू म्हणजे हाताच्या पाचही बोटांनी वळलेली सशक्त मूठ होती. त्या मुठीची कळ होती ती म्हणजे त्यांची माता-राजमाता कुंतीदेवी-माझ्या सासूबाई.
द्रौपदीच्या आयुष्यात ठ्ळक अशी तीन महत्त्वाची वळणे होती. पहिले तिचे स्वयंवर की ज्यामुळे तिला पाच पती लाभले.तशीच अनुभवी राजमाताही लाभली. दुसरं वळणं होतं ते युधिशिष्ठिराचा आणि दौपदीच्या राज्याभिषेकाच. तिसर आणि महत्त्वाच वळण होत ते राज्याभिषेक आणि राजसूय यज्ञ यामधील कालखंडाच. त्या कालखंडात दौपदी पुत्रवती झाली आणि पांडवांचे इतर विवाह झाले. राजसूय यज्ञाच्या वेळी दौपदीकडून अनवधानाने एक अक्षम्य चूक झाली. ती म्हणते 'एक मनोमन झालेल्या, पुढ मलाच न पटलेल्या सुप्त विचाराची आणि दुसरी मी काढलेलया उदगारांची. अर्थातच तिचा निर्देश कर्ण सहावा पती म्हणून लाभला असता तर आणि मयसुराने तयार केलेल्या राजवाडयात पाण्यात पडलेल्या दूर्योधनाला उद्देशून काढलेल्या उदगारांकडे आहे. पुढे द्रौपदी म्हणते कि मला कर्णाबद्दल जे अनाकलनीत आकर्षण वाटल होत त्यात कोणताही शारीरिक वासनांचा भाव नव्हता. तो जन्मजात सूर्यभक्त आणि मी जन्मजात अग्निकन्या यांचा तो तेजाकर्षाणाचा भाग होता असे मला आज पूर्ण विचारांती वाटत.
द्रौपदी सांगते की आपल्या मनाच्या चक्षूंनी रोज श्रीकृष्णाचे दर्शन घेणे आणि त्याचे चिंतन करणे याशिवाय एकही दिवस गेला नाही. आकाशातल्या तारका जशा कुणाला मोजता आल्या नाहीत तसे श्रीकृष्णाची रोज दिसलेली रूपे भिन्न होती. आपल्याजवळ असलेल्या सुदर्शन यंत्राचा उपयोग नेहमी का करत नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतो " अट्टाहासाने जर का या तेजयंत्राचा उपयोग करायचा ठरवला तर जवळ येणारे हवेहवेसे वाटणारे, मानससरोवरातील शुभ्रधवल हंसपक्षासारखे, तेजयंत्राचे बोल हा हा म्हणता आठवेनासे होतात!मृगातील विजेच्या कडकडाटाने ते राजहंस कुठंच्या कुठं पांगले जावे तसे दूर उडून जातात. मग येणारा शारीरिक अनुभव पराकोटीचा थकव्याचा असतो. त्यामुळे मी क्षणैक थरथरतो. सुदर्शनाच्या प्रयोगाचा विचार गोकुळाच्या गोपींनी यमुनेत कोजागिरीचे द्रोणदिवे सोडून मोकळ व्हाव तसा दूर सोडून मोकळा होतो. खर सांगायच तर कृष्णे ,मला कुठल्याही कर्मात मनोमन कधीच अडकून पडावंसं वाटल नाही हे निदान तुला तरी समजायला हरकत नाही. "
लाभलेल्या अपार सौंदर्यामुळे आपल्या ठायी एक अहंभाव आला आहे याची जाणीव द्रौपदीला होती. ती जाणीव कृष्णानं अत्यंत कौशल्यानं माझ मन राखून तिला वेळोवेळी करून दिली होती. ते करताना तो हसत म्हणाला होता," सौंदर्यायाला विनय शोभून दिसतो कृष्णे. अप्रतिम स्त्रीच्या ठायी तो असला तर सुवर्णाला प्राजक्त फुलांचा सुगंध येतो." वनवासात भेटायला आलेल्या कृष्णाला पाहून आपल्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन सांगण्याआधी ह्याने दुष्टांचा पाडाव का केला नाही या विचाराने द्रौपदीचे मन क्रोधाने भरून येते. तेव्हा तिला शांत रहायला सांगणार्‍या कृष्णाच्या प्रेमाने क्षणात तिला आनंद होतो. "कृष्णे तू कोणत्या मनोभावात आहेस हे मी जाणतो, स्थिरचित्त हो मग मी निवांत बोलणार आहे तुझ्याशी. सावर स्वत:ला. " त्याचे हे उद्गार ऐकून द्रौपदी म्हणते की तो भाव जपणारा होता पण भाऊक नव्हता. तो सर्वांशी समरस होणारा पण कुणाच्याच मनोभावात वाहून जाणारा नव्हता. त्याचे विचार ऐकून मी स्वत:ला सावरलं.
आपल्यावर द्यूतानंतर झालेल्या अन्यायानंतरही आपले पती कसे शांत राहीले, दिग्गजांनी भरलेल्या सभेत कोणीच कशी तिची रक्षा केली नाही हे सांगताना द्रौपदीचा रोखून धरलेला संताप बाहेर येतो, भरसभेत आपली झालेली विटंबना तिने श्रीकृष्णाला सांगितल्यावर तो म्हणतो," सखे तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा तुझे पती कौरवांना पराभूत करून घेतील. यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करेन व विजय मिळवून देईन हे तुला वचन देतो. "यानंतर द्रौपदीने जयद्रथाकडून झालेले तिचे हरण व भीमार्जुनानंनी केलेली सुटका, अज्ञातवासाचे गुप्तपणे श्रीकृष्णाबरोबर केलेले आयोजन याचे सखोल वर्णन केले आहे. शिवाजी सावंतांनी अज्ञातवासाचे दिवस, विराटसेनापती कीचकाचा भीमाने केलेला वध या घटना अत्यंत प्रभावीपणे आपल्या डोळ्यासमोर द्रौपदीच्या व्यक्तिरेखेद्वारे उभ्या केल्या आहेत.
कृष्णशिष्टाई अयशस्वी झाल्यानंतर पांडवांच्या वतीने श्रीकृष्णानेच निर्णायक युध्दाचा निर्णय घेतला होता. हे युद्ध मात्र आता केवळ कौरव पांडवांच राहिले नाही. ते झाले संपूर्ण आर्यावर्ताचे. अन्यायाविरुद्धच्या न्यायाच! दमनाविरुध्दच्या दया-क्षमेचे! असत्याविरुद्ध सत्याच!पांडव युध्दाच्या तयारीला लागल्यानंतर द्रौपदी म्हणते की माझे कितीतरी दिवस नुसते विचार करण्यात व थकल्यानंतर श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात निघून गेले. युध्दासाठी कोणाचा पक्ष घेणार असे विचारण्यास द्वारकेला निघालेल्या अर्जुनास द्रौपदी सांगते की काही झाले तरी श्रीकृष्णाचा पाठिंबा चुकवू नकोस,त्याला पांडवांपासून दूर जाऊ देऊ नकोस. इतर सर्व जग आणि त्याचा पाठिंबा चुकवलास तरी चालेल. यानंतर द्रौपदीने युद्धाची तयारी, सैन्याची मांडणी, डावपेच इत्यादींचे ओघवते वर्णन केले आहे. युद्ध सुरु होताना व झाल्यावर एक महाराणी म्हणून व पांडवांची पत्नी म्हणून होणारी तिच्या मनाची घालमेल, उत्सुकता, अधिरता वाचकाला खिळवून ठेवते. परंतु एक क्षत्राणी म्हणून ती म्हणते की आमच्या रक्तातच भिनल असत की जीवन हाच एक संग्राम आहे. अभिमन्यूच्या वधानंतर शोकाकूल द्रौपदीला कृष्ण म्हणतो"याज्ञसेने युध्द म्हणजे महायज्ञ!त्यात कुणाकुणाला आणि कसली कसली कसली समिधा अर्पण करावी लागेल सांगता येत नाही."यापुढील भागात आपण अर्जुनाच्या व्यक्तिरेखेचा आढावा घेऊ.


युगंधर रसास्वाद भाग ४
अर्जुनाची व्यक्तिरेखा आपल्या समोर रेखाटताना शिवाजी सावंतांनी कृष्णाच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या समोर उलघडले आहेत. श्रीकृष्णाचे जीवन समजणे किती अवघड आहे व त्याचा आवाका किती मोठा आहे ते स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो,"श्रीकृष्णावर विचार करू लागलो की घटनांचे मृगतांडे मनात धपाधप उड्या घेत अनावर गतीने धावू लागतात. अनेकविध आकारांच्या रंगवैभवी मयूरपक्षांचे थवेच थवे मनाच्या किनाऱ्यावर केकारव करीत अलगद उतरू लागतात. त्यातील कुठल्याही एकावर म्हणून दृष्टी जखडून ठेवता येत नाही. मला आठवेल तशी ही कृष्णार्जुनगाथा मी सांगतो आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की त्याच जीवन म्हणजे मला गांडीव धनुष्याबरोबर मिळालेल्या अक्षय्य भात्यासारखे आहे."
अर्जुनाला त्याच्या नावाचा अर्थ समजावून सांगतला तो कृष्णाने. अर्जन म्हणजे मिळवणे , प्राप्त करणे. जगातील कीर्तीला नेणार निवडक ज्ञान म्हणून जे जे काही आहे त्याच अर्जन करणे हेच तुझ जीवनसाफल्य आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो.
अर्जुनाशिवाय मोजक्यांनाच श्रीकृष्ण सखा म्हणायचा. त्यात त्याचा सारथी दारूक होता. परममित्र सुदामा होता. हस्तिनापूरचे महात्मा विदूर आणि मंत्री संजय होते. आणि उद्धवदादा होते. आपण श्रीकृष्णसखा आहोत ही कल्पनाच अर्जुनाला आनंददायी होती आणि म्हणून आपल्याला कृष्णाने सखा म्हणावे असे अर्जुनाला वाटे. पण प्रसंगानुरुप श्रीकृष्ण त्याचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने करीत असे हे सुद्धा अर्जुनाला समजले होते.
युगंधरमध्ये या भागात आपल्या भावंडांचे, मातेचे आणि द्रौपदीचे वर्णन अर्जुनाने केलं आहे. जगाच्या दृष्टीने पाच वेगळे बंधू वाटले तरी पाचजणांच एका बळकट मुठीसारखं अभेद्य अस्तित्त्व होतं. त्यात एकीत मोठा वाटा होता कुंतीमातेचा आणि द्रौपदीचा. पण कोणत्याही तराजूत घालून न जोखता येण्याजोगा वाटा होता तो परमसखा श्रीकृष्णाचा. त्याच्याच मार्गदर्शनाने पांडव लाक्षागृहापासून तर अज्ञातावासापर्यंत सगळ्या अवघड प्रसंगातून बाहेर पडले होते.
श्रीकृष्णाने पुनर्वसित केलेल्या हजारो कामरूप स्त्रियांचा विचार अर्जुनाच्या मनात येतो तेव्हा तो म्हणतो,' की स्त्रीत्वाचा जो अर्थ कृष्णाला कळला होता तो एकाही वीराला कळला नव्हता.'
द्रौपदीचे विभाजन, पाच पतींबरोबर तिच्या एकांताची संहिता कुंतीने श्रीकृष्णाच्या मदतीने आखली होती. आपल्या पुत्रांचे नामकरण व पालनपोषण या सर्वाकरता, आपल्याला सखा श्रीकृष्ण सदैव आपल्याला मागर्दर्शन करीत होता याची जाणीव अर्जुनाला सतत होती.
जीवनाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आपले जेष्ठ बंधू युधिष्ठिर व भीमाची निवड न करता आपलीच निवड श्रीकृष्णाने का केली असावी याची कारणेही अर्जुनाने दिली आहेत.
अर्जुनाच्या आयुष्यातील अथवा अर्जुन साक्षीदार असणाऱ्या कित्येक घटना आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य युगंधरमध्ये आहे. नागकन्या उलुपीशी विवाह, पाशुपतास्त्राची प्राप्ती व त्यानंतर अर्जुनाची बदललेली मनोवृत्ती याची वर्णने उदाहरण म्हणून देता येतील. त्याशिवाय चित्रागंदेकडून नृत्याचे शिक्षण, सुभद्राहरण, अश्वत्थ्याम्याने केलेली दिव्य सुदर्शनचक्राची मागणी, द्रोणाचार्यांनी एकलव्याला मागितलेली गुरुदक्षिणा अशीही अनेक उदाहरणे देता येतील.
अर्जुनाने आपल्या भावंडांबरोबर धृतराष्ट्र, भीष्म, दूर्योधन,द्रोणाचार्य, शकुनी यांचे स्वभाव विश्लेषणही केले आहे. यादवांच्या इतर स्त्रिया आणि कौरव पांडवांच्या स्त्रिया यांची तुलनाही त्याने द्रौपदी, राधा आणि रुक्मिणीशी केली आहे. ही सर्व वर्णने मनोवेधक आहेत. श्रीकृष्णसखी व आपली पत्नी दौपदी, हिच्याबद्दल अर्जुनाला वाटणारा आदर व अर्जुनाचे आपल्या मातेवरील निस्सीम प्रेमही आपल्याला कित्येक ठिकाणी दिसते.
कुरुक्षेत्रावरील सैन्याची मांडणी व त्याचे वर्णन वाचनीय आहे. 'आपल्याच नातेवाईकांना, जेष्ठांना, गुरुजनांना युद्धात मारायचे' या विचाराने हतबल झालेला अर्जुन आपल्या डोळ्यासमोर वर्णनाद्वारे उभा राहतो. त्यावेळी त्याला श्रीकृष्णाने गीतेसारख्या अमर जीवनतत्त्वाची जाणीव करुन दिली. त्याचे वर्णन वाचताना शिवाजी सावंतांच्या लेखणीचे सामर्थ्य कळते. यासर्वाचा आढावा घेणे माझ्या आवाक्याबाहेर आहे.
अभिमन्यूच्या वधाने संतप्त अर्जुनाने, 'दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध करेन अन्यथा अग्निप्रवेश करेन' अशी प्रतिज्ञा केली. जयद्रथाला ठार करता न आल्याने अर्जुनाने अग्निप्रवेशाची तयारी केली. 'त्यावेळी चितेवर चढताना गांडीव धनुष्य बरोबर ठेव' असा सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. 'माझ्या तर्जनीकडे लक्ष ठेव' असाही धनुष्यधारी अर्जुनाला महत्त्वाचा संदेश श्रीकृष्णाने दिला. त्यावेळी सूर्यग्रहणाचे वेध सुटताच रणभुमीवर सूर्यदेव अवतरले याचे वर्णन शिवाजी सावंतांनी अलंकारीक भाषेत केले आहे.
जयद्रथाच्या वधानंतर युद्धाचा चौदावा दिवस संपतो. "आपण एक सामान्य नर आहोत आणि श्रीकृष्ण म्हणजे नारायण आहे" या अर्जुनाच्या वाक्याने युगंधरच्या 'अर्जुन' ह्या भागाचा शेवट होतो.

3 comments:

Dhananjay said...

Hi,

Do you know if the book is published in Gujarati. I need that version.

I appreciate if you can help me.

Thanks!
Dhananjay
dgoyani@gmail.com

ANJALI said...
This comment has been removed by the author.
ANJALI said...

KRISHNA ha aplya YUGANDHARI vyaktimatvamulech SHREEKRISHNA zala
khup sunder ahe YUGANDHAR ani SHREEKRISHNACH YUGANDHARI jeevan...........!!!